राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा सल्ला
पुणे – माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी राष्ट्रवादीवर टीका करण्यापूर्वी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असती तर बरे झाले असते, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
“राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आडमुठेपणामुळे हर्षवर्धन पाटील पक्ष सोडत आहेत,’ अशा प्रकारची टीका महाराष्ट्र “इंटक’चे
अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केली आहे. ती करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या अध्यक्षांशी चर्चा केली असती तर बरे झाले असते. आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये काय ठरले आहे, तसेच इंदापूरच्या जागेसंदर्भात अजून अंतिम निर्णय झाला नाही, असे काकडे यांचे म्हणणे आहे.
दीड वर्षांपूर्वी शरद रणपिसे यांची विधानपरिषदेवर निवड झाली त्याचवेळी पक्षत्यागाचा निर्णय कोणी घेतला होता, हे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना जरूर विचारावे, असा टोलाही छाजेड यांना लगावला आहे. सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादीने जागा सोडली नाही, त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला नुकसान झाले असे वक्तव्य छाजेड यांनी केले आहे.
याबाबतही छाजेड यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली तर नेमकी वस्तुस्थिती समजेल. शरद पवारांनी नेहमी गांधी घराण्याचा द्वेष केला, असे छाजेड म्हणतात. 1999 नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सद्यस्थितीत राहुल गांधी आणि शरद पवार यांचे संबंध कसे आहेत हे त्यांनी दिल्ली येथे जाऊन समजावून घ्यावे, म्हणजे अशी पत्रकबाजी करण्याची वेळ येणार नाही, असेही काकडे यांनी म्हटले आहे.