जकार्ता – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो जण बेपत्ता झाले आहेत. इंडोनेशियाच्या पूर्व भागामध्ये ही दुर्घटना घडली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
इंडोनेशियाच्या पूर्व भागातील लामेनेले गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक घरे गाडली गेली आहेत. बचाव पथकाने मातीच्या ढिगाऱ्याखालून 38 मृतदेह बाहेर काढले आहेत. यामध्ये 5 जखमींचाही समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गावातील काही घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली असून पुरामुळे 40 घरांचे नुकसान झाले आहे. या भागातील अनेक घरे पुरात वाहून गेली असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागल्याचे वृत्त आहे.
इंडोनेशियात दर वर्षी मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे पूर्व भागातील अनेक नद्यांना पूर आला आहे.
पुराशी संबंधित घटनांमध्ये आणि अनेक जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. जखमींना शोधून काढून रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पुरामुळे तब्बल 10 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. जानेवारी महिन्यात पश्चिम जावा प्रांतात झालेल्या भूस्खलनामुळे 40 जण गाडले गेले होते.