प्रियांका गांधी: नोकऱ्या देण्याच्या बड्या आश्वासनांमागील सत्य
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. देशातील सात बड्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे साडेतीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार बनले. नोकऱ्या देण्याच्या बड्या आश्वासनांमागील ते सत्य आहे, असे प्रियांका यांनी म्हटले.
मागील पाच वर्षांत 3 कोटी 64 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याचे एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याचा संदर्भ देऊन प्रियांका यांनी ट्विट केले. मोठी-मोठी नावे आणि जाहिरातींचा परिणाम म्हणजे ती बेरोजगारी आहे. त्यामुळेच सरकार नोकऱ्यांविषयी बोलण्यावर कचरत आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.
प्रियांका यांच्याआधी त्यांचे बंधू आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. रोजगार उपलब्ध नसतील तर युवकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार नाही. तशा स्थितीत प्रजासत्ताक मजबूत कसे बनेल, असा सवाल त्यांनी ट्विटरवरून केला.