नवी दिल्ली-देशात मंगळवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 2 हजार 3 करोनाबळींची नोंद झाली. एकाच दिवसातील तो उच्चांक ठरला. अर्थात, त्यामागे महाराष्ट्र आणि दिल्लीने आकडेवारीत केलेली सुधारणा कारणीभूत ठरली.
महाराष्ट्रात याआधी नोंद न झालेल्या 1 हजार 328 मृतांचा समावेश आकडेवारीत करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात मंगळवारी रात्रीपर्यंत 1 हजार 409 मृतांची भर पडली. दिल्लीनेही आकडेवारीत सुधारणा करत आणखी 437 मृत्यू जाहीर केले. त्यामुळे देशातील करोनाबळींची संख्या एकाच दिवसात 2 हजारने वाढली. आता देशात करोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 12 हजारांवर गेली आहे. करोनाने देशात सर्वांधिक जीवितहानी महाराष्ट्रात घडवली आहे. आकडेवारीत सुधारणा केल्याने गुजरातला मागे टाकून दिल्ली दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. दिल्लीत करोना संसर्गामुळे 1 हजार 800 हून अधिक बाधित दगावले आहेत. तर गुजरातमध्ये ती संख्या 1 हजार 500 च्या वर आहे.
देशात सलग सहाव्या दिवशी 10 हजारहून अधिक नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या 3 लाख 55 हजारांच्या घरात पोहचली आहे. देशात सर्वांधिक करोनाबाधित महाराष्ट्रातच आहेत. त्याखालोखाल तामीळनाडूने 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीत सुमारे 45 हजार तर गुजरातमध्ये जवळपास 25 हजार करोनाबाधित आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील बाधित करोनामुक्त होण्याचे प्रमाण 53 टक्क्यांजवळ पोहचले आहे. देशात 1 लाख 55 हजारहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर सुमारे 1 लाख 87 हजार बाधित बरे झाले आहेत.