पुणे(प्रतिनिधी) – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) मराठा, कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील एम.फिल व पीएच.डी करणाऱ्या 146 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून “मुख्यमंत्री विशेष संशोधन शिष्यवृत्ती’ जाहीर केली. परंतु, त्यापैकी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्तीच प्राप्त झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी हवालदील झाले आहेत.
“सारथी’तर्फे विविध विद्यापीठांमध्ये एम.फिल., पीएच.डी करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना “मुख्यमंत्री विशेष संशोधन शिष्यवृत्ती’ दिली जाते. दरमहा 31 हजार रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी “सारथी’ने रितसर अर्ज मागवून, लेखी परीक्षा व मुलाखत घेऊन 146 विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना 11 सप्टेंबर 2019 रोजी शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. त्यानंतर 40 जणांना या शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता देण्यात आला. मात्र, उर्वरित शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना आठ महिने उलटल्यानंतरही शिष्यवृत्ती मिळालेली नाही.
या शिष्यवृत्तीसाठी सरकारने 50 कोटी रुपये निधी “सारथी’ला उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून टप्याटप्याने सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे अपेक्षित असताना अद्याप शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी प्रतीक्षा करणे ही दुर्देव आहे. विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्टुडंट्स हेल्पिंग हॅंन्डचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी दिला आहे