कोलकता – केंद्र सरकारकडून भाजपशासित राज्यांना करोनावरील लसींचा अधिक पुरवठा केला जात आहे. मात्र, लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या पश्चिम बंगालसारख्या राज्याला तुलनेने खूपच कमी पुरवठा होत आहे, असा आरोप त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी केला. तसे पत्र त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले.
बंगालमधील पात्र नागरिकांच्या लसीकरणासाठी लसींच्या 14 कोटी डोसची गरज आहे. दरदिवशी बंगालमध्ये 4 लाख डोस दिले जात आहेत. आमची क्षमता दरदिवशी 11 लाख डोस देण्याची आहे. त्या तुलनेत खूप कमी डोस उपलब्ध होत आहेत.
भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरातसारख्या राज्यांना मोठ्या प्रमाणात डोस पुरवले जात आहेत. इतर राज्यांना अधिक डोस देण्याला माझा आक्षेप नाही. मात्र, बंगालकडे दुर्लक्ष केले जात असेल तर मी केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकणार नाही, असे ममतांनी पत्रात म्हटले.
बंगालला लसींचा पुरेसा पुरवठा झाला नाही तर स्थिती आणखी बिकट बनेल, असा इशाराही त्यांनी दिला.