हैदराबाद – मागील आठवड्यात अतिवृष्टीच्या फटक्याने उध्वस्त झालेले जुने हैदराबाद आता आणखी मुसळधार पावसासाठी सज्ज असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे किमान आता तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे प्राणहानी होणार नाही; झाल्यास कमीतकमी होईल, असे मानले जात आहे.
मागील आठवड्यात जुन्या हैदराबादेत परतीच्या मोसमी पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे तेलंगणमध्ये किमान 69 जणांचा मृत्यु झाला. तर अनेक घरे जमिनदोस्त झाली आणि वाहनांसह गुरेढोरे वाहून गेली. या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर झालेल्या हानीचे पंचनामे सुरु असतानाच, हवामान खात्याने येत्या चार दिवसांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मदत व बाचव यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागील आठवड्यात तेलंगणच्या राजधानीचे शहर असलेल्या हैदराबादेत 20 ते 32 सेंमी पाऊस 24 तासांत नोंदला गेल्याने अनेक ठिकाणी हाहाकार उडाला होता. त्यामध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले, तर काही ठिकाणी इमारती पडल्याने ढिगाऱ्याखाली अडकून अनेक नागरिक मरण पावले. काही जण वाहून गेले तर अनेक ठिकाणी वाहने, पाळीव जनावरेही वाहून गेली.
या अतिवृष्टीच्या संकटाने उस्मानिया विद्यापिठाच्या पदवी आणि पदवीपूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले असून कोव्हिड19 आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण जवळपास ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.