नवी दिल्ली-करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था किती संकोचली जाणार आहे, याचे मूल्यांकन अर्थमंत्रालयाने सुरू केले आहे. त्याचबरोबर नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणखी पॅकेजची शक्यता खुली आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विमोचनावेळी सीतारामन म्हणाल्या की, प्रत्येक पॅकेज जाहीर करण्याअगोदर केंद्र सरकारने सर्वसमावेशक विचार केला आहे. गेल्या पंधरवड्यात सीतारामन यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना काही सवलती व राज्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे.
केंद्र सरकारने सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, ज्या कंपन्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत, त्या कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार नाही. यासंदर्भातील वर्गवारी करण्याची प्रक्रिया चालू आहे, असे सीतारामन म्हणाल्या.