20 टक्के मनुष्यबळ कपात : वाहन उद्योगाकडून दिलासा
कच्च्या मालाच्या दरात वाढ, कशुल मनुष्यबळाचीही कमतरता
पिंपरी – करोनामुळे सहा महिने उत्पादन प्रकल्प बंद राहिल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांना (एमएनसी) आर्थिक झळ सोसावी लागली आहे. मात्र, मध्यम आणि लघु उद्योगांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. उद्योगनगरीचा महत्वाचा घटक असलेल्या वाहन उद्योगाने मात्र लॉकडाऊननंतर आपला आलेख चढता ठेवल्याने, या क्षेत्रातील उद्योगांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. परंतु कच्च्या मालाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ झळ भरून काढण्यात अडथळा ठरत आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे विविध प्रकारचे फंड उपलब्ध असल्याने, वर्ष सहा महिन्याच्या कालावधीत असे उद्योग तग धरु शकतात. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतींमधील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तर करोना काळात कामगारांची घेतलेली काळजी, त्यांना पुरविलेल्या सुविधा या कामगारविश्वासमोर एक आदर्श आहे.
मात्र, काही मध्यम आणि लहान उद्योगांवर मोठे आर्थिक संकट आल्याने त्यांनी मनुष्यबळ कपातीवर भर दिला. या कालावधीत उद्योगनगरीतील किमान 20 ते 30 टक्के कंत्राटी अकुशल मनुष्यबळ कपात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. एकीकडे कामगार कपात झाली असली तरी दुसरीकडे मात्र त्याच उद्योगांना कशुल मनुष्यबळाचा मोठा तुटवडा अजूनही जाणवत आहे.
कच्च्या मालाचे वाढते दर
उद्योगांना लागणारे स्टील, कॉपर, ब्रॉस, वेल्डिंग रॉड, प्लास्टिक या कच्च्या मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. स्टीलची आयात थांबल्याचा फायदा घेत स्थानिक कंपन्या सातत्याने स्टीलचे दर वाढवित आहेत. रोज बदलणाऱ्या कच्च्या मालाच्या दरांमुळे उद्योजक हैराण झाले आहेत. अनलॉकपासून आतापर्यंत कच्च्या मालाच्या दरात 50 ते 60 टक्के वाढ झाली आहे. जुन्या ऑर्डर अजूनही जुन्या दराने दिल्या आहेत. मोठ्या कंपन्या दर वाढवून देत नसल्याने जुन्या दरांमध्ये काम करणे उद्योजकांसाठी अवघड झाले आहे.
सर्वच प्रकारच्या कच्च्या मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सातत्याने वाढ होतच आहे. कच्चा माल उत्पादक कंपन्या आणि विक्रेते परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. जुन्या दरांमध्ये ऑर्डर पूर्ण करणे अशक्य झाले आहे. अनेक लघु उद्योजकांना हातात काम असूनही दरातील तफावतीमुळे काम पूर्ण करता येत नाही. दर नियंत्रणाबाबत सरकारनेच काही निर्णय घेण्याची गरज आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना