रत्नागिरी – राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. करोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. आयआयटीने देखील परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्स्फर्ड विद्यापीठासह अन्य विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठे असेल, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगाविला. तसेच अगदीच कोणी काही चुकीचे केले, असा निष्कर्ष काढला असे मला वाटत नाही, असेही पवार म्हणाले.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे दोन दिवसीय कोकण दौ-यावर आहेत. यावेळी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर भाष्य केले. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असे चित्र असताना, पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
पवार म्हणाले, पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला, तर भारतातील नामांकित विद्यापीठे तसेच जगातील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खासगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील, तर शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यात अगदीच चुकीचं कोणी केले आहे होत असं नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरुनही टोलेबाजी केली. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल, असे शरद पवार म्हणाले.