मुंबई – “निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेल्या कोकणवासीयांना राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने एनडीआरएफपेक्षा अधिक पटीने नुकसानग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीबाबतही घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, चक्रीवादळाने मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे आणि अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. यासाठी एनडीआरएफने प्रत्येक कुटुंबाला कपड्यांसाठी आणि भांडी घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिले जात होते. मात्र, राज्य सरकारने यासाठी आता प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
घरांची पडझड झाली त्यांना आता 95 हजार दिले जात आहेत. अंशतः पडझड झालेल्या घरे आणि झोडप्यांसाठी 6 हजार रुपये दिले जात होते, आपण 15 हजार रुपये देणार आहोत. तसेच स्थानिक दुकानदारांना 10 हजार रुपयांपर्यंत मदत किंवा 75 टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे.फळबागांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये दिले जायचे, आपण हेक्टरी 50 हजार रुपये मदत देणार आहोत. एनडीआरएफने जाहीर केलेल्या मदतीच्या पुढे जाऊन राज्य सरकार मदत करत आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील कापसाच्या प्रश्नावर देखील उपाययोजना केली जात आहे. शेतकऱ्यांचा सर्वच्या सर्व कापूस खरेदी करायचा असा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या मनात सारखी पावसात आपला कापूस भिजला तर नुकसानीची भीती होती. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी होणार आहे. या व्यतिरिक्त मका, चना आणि इतर डाळी यांचीही खरेदी केली जाईल, असेही अजित पवार म्हणाले.
मागील वर्षीच्या पुरात झालेल्या काही नुकसानग्रस्तांना अद्यापही त्यांची मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्या नुकसानग्रस्तांचे पुराच्या नुकसानीचे पैसे देणे बाकी आहेत त्यांना तत्काळ पैसे दिले जातील. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना केल्या आहेत. यावर कॅबिनेटमध्येही निर्णय झाला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
मदतीसाठीच्या निकषात बदल – ठाकरे
निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाहणी केली असून यात अतोनात नुकसान झाले आहे. विशेषत: रायगड जिल्हा, रत्नागिरीतील दापोली, मंडणगण येथे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरु आहेत. पंचनामे आल्यावर नुकसान किती झाले आहे याची माहिती मिळेल. त्यानंतर भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदतीसाठी निकष बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निकष बदलण्यात आले आहेत. बदललेल्या निकषाप्रमाणे मदत घोषित करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.