नवी दिल्ली – पाकिस्तानी आणि चीनी कुरापतींची गंभीर दखल केंद्रीय अर्थसंकल्पातूनही घेण्यात आली आहे. त्यातून सीमांचे रक्षण करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलांसाठी अधिक निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी आणि इतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी 1 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी ती तरदूत 92 हजार 848 कोटी रूपये इतकी होती.
यावेळी ती सुमारे 7 टक्क्यांनी वाढली आहे. सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) आता 20 हजार 729 कोटी रूपये मिळणार आहेत. मागील वेळी त्या दलाला 19 हजा 377 कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. पाकिस्तान आणि बांगलादेशलगत असणाऱ्या सीमांचे रक्षण बीएसएफ करते. चीनी कुरापतींना लगाम घालण्याची जबाबदारी असणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलीस दलासाठी (आयटीबीपी) 6 हजार 567 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मागील वेळेपेक्षा ती 400 कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाट्याला 26 हजार 197 कोटी रूपये आले आहेत. मागील वेळी त्या दलाला 24 हजार 788 कोटी रूपये मिळाले होते. अंतर्गत सुरक्षेबरोबरच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांची जबाबदारी सीआरपीएफवर आहे.