पुणे – लाल मिरची अधिक तिखट बनली आहे. परदेशातून वाढलेली मागणी, शीतगृहातील संपत चाललेला साठा, त्यातच मसाला उत्पादकांकडून मागणी वाढल्याने भावात मोठी वाढ झाली आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मसाला उत्पादकांकडून मिरचीला मागणी वाढली आहे.चीनमध्ये करोनाचा संसर्ग झाल्यानंतर तेथून लाल मिरचीच्या मागणीत घट झाली आहे. बांगलादेश, फिलिपीन्स, श्रीलंका आणि थायलंड हे देशही भारतीय मिरचीची खरेदी करत आहेत. एकूण मिरचीचा उपलब्ध साठा पाहता मिरचीचे भाव तेजीत असल्याचे व्यापारी वालचंद संचेती यांनी सांगितले. मिरचीवर 5 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यात येतो. मिरची जीवनावश्यक वस्तू आहे. त्यामुळे मिरचीवर जीएसटी आकारू नये, अशी आमची मागणी होती. जीएसटी आकारणीमुळे किरकोळ बाजारात मिरचीचे भाव तेजीत असल्याचे त्यांनी सांगितले.
साधारण जानेवारीच्या सुरुवातीला लाल मिरचीचे भाव कमी होत असत. जानेवारी महिन्यात नवीन मिरचीची आवक होते. यंदाच्या हंगामात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात लाल मिरचीचे उत्पादन दोन ते अडीच कोटी पोती (एक पोते 40 किलोचे) होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकामध्ये 60 ते 65 लाख पोती उत्पादन होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातदेखील 8 ते 10 लाख पोती उत्पादन होईल. अशा पद्धतीने संपूर्ण देशात सव्वातीन ते साडेतीन कोटी पोती मिरची उपलब्ध होऊ शकेल. गेल्या हंगामाएवढे यंदा उत्पादन होणार असले, तरी गेल्या वर्षीचा मिरचीचा साठा संपत चालला आहे. गेल्या हंगामात लाल मिरचीची 40 ते 45 लाख पोती (एक पोते 40 किलोचे) शीतगृहात पडून होती. यंदा शीतगृहातील मिरचीचा साठा संपत आला असून त्यामुळे लाल मिरचीचे भाव चढे राहण्याची शक्यता आहे, असे त्यांनी नमूद केले.