मुंबई– अमिरातीत रविवारपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या उर्वरीत स्पर्धांमधून विजेतेपद पटकावण्याची क्षमता मुंबई इंडियन्सकडेच असल्याचा विश्वास माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केला आहे.
स्पर्धेतील सगळ्याच संघांचे बलाबल पाहता मुंबईलाच विजेतेपदाची सर्वात जास्त संधी असल्याचेही त्याने सांगितले.
आयपीएलचा दुसरा टप्पा अमिराती, दुबई, अबूधाबी व शारजामध्ये होत आहे. मला वाटते की दिल्ली आणि मुंबई पुन्हा एकदा आयपीएल विजेतेपदाचे दावेदार असतील. पाच वेळचा विजेता असलेला मुंबई संघ जास्त भक्कम वाटत आहे. तसे पाहता दिल्ली, चेन्नई संघही चांगले आहेत मात्र, एकच विजेता सांगायचा असेल तर मी मुंबईचे नाव घेइन, असेही सेहवाग म्हणाला.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल चहर या सहा जणांची टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबईने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले तर त्यांनाच यंदा सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही सेहवागने सांगितले.