अमरावती – अमरावतीकरांसाठी फेब्रुवारी महिना हा अत्यंत चिताग्रस्त ठरला आहे. येथे 28 दिवसांत तब्बल 13063 नवीन करोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर 94 जणांचा मृत्यू झाला आहे. करोना रूग्णांची वाढती संख्या पाहता शहरात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही करोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही.
जानेवारीत येथील रूग्णसंख्या कमी होती. रूग्णवाढीचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र, निष्काळजीपणामुळे अमरावतीत करोनाचा स्फोट झाल्यासारखे वातावरण आहे. विनामास्क वावरणारे नागरिक, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, त्यातच आलेली ग्रामपंचायतीची निवडणूक या सर्वांमुळे फेब्रुवारीत रूग्णसंख्या वाढल्याचे दिसतेय.
रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने 22 फेब्रुवारीपासून अमरावती शहर आणि अचलपूर शहरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतरही दररोज 650 ते 700 च्या घरात रूग्ण वाढत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा अमरावती शहर आणि अचलपूर शहरात आठ दिवसांपर्यंत लाॅकडाऊन वाढविला आहे.
नागपूर लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर –
नागपूर शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीही गंभीर बनलीय. जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्णांचा आकडा 9141 झाला आहे. नागपूर पालिका हद्दीत शुक्रवारी 881 नवीन रूग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्याच्या अन्य भागात आणखी 293 रूग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासन अलर्ट झाले आहे. दोन दिवस अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जर रूग्णसंख्या वाढत गेली तर लाॅकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता बळावत आहे.