पुणे – “वायू’ चक्रीवादळानंतर आता मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले असून त्याची वाटचाल सुरू झाली आहे. सध्या कर्नाटकाच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागात मान्सून पोहचला आहे तेथून त्याची आगेकूच सुरु असून लवकरच तो कर्नाटकाच्या इतर भागात सुद्धा दाखल होईल. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिला तर येत्या चार ते पाच दिवसात तो कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने कळविले आहे.
दरम्यान, जून महिना निम्म्यावर आला, तरी अद्याप राज्यात कुठेही पावसाचे दमदार आगमन झालेले नाही. उलट हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. मान्सूनचे वारे सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वाहत आहेत त्यांना सुद्धा फारसा जोर नाही. पण, मराठवाडा आणि विदर्भात तर अद्याप वारे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे रविवारपासून पुन्हा या परिसरातील तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.