पुणे – देशात अलीकडील वर्षांमध्ये मान्सूनच्या परतीसाठी सातत्याने विलंब होत आहे. यंदादेखील देशात मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.
अद्याप मान्सूनच्या परतीसाठी अनुकुल स्थिती निर्माण झालेली नसल्याने यावर्षी परतीचा प्रवास 10 ते 15 दिवसांनी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विभागाच्या यापूर्वीच्या नोंदीनुसार 2017 ते 2020 या चार वर्षांमध्येदेखील मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडला होता. यंदादेखील तीच स्थिती असल्याने हिवाळ्याचे आगमनही उशिरा होण्याची शक्यता आहे. पावसाच्या बदलत्या प्रमाणामुळे शेतीविषयक कामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशात विशेषत: महाराष्ट्रात यावर्षी पावसामुळे शेतीचे बरेच नुकसान झाले असताना, मान्सूनच्या लांबणीमुळे हिवाळ्यातील रब्बीच्या हंगामावरही त्याचा काही अंशी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साउथ वेस्ट मान्सूनच्या परतीचा प्रवास उत्तर-पूर्व भागातून सुरू होतो. याठिकाणी सतत पाच दिवस पाऊस न पडल्यास नैऋत्य मोसमी वारे वायव्य भारतातून माघार घेतात. यावेळी या भागात वाऱ्याची अँटीसायक्लोनिक स्थिती तयार होते. तसेच आर्द्रतेमध्येही लक्षणीय घट होते. मात्र, अशी कोणतीही स्थिती सध्या दिसून येत नाही. त्यामुळेच आगामी 10 दिवस उत्तर भारतातून मान्सून माघार घेण्याची चिन्हे नाहीत.
“देशात साऊथ वेस्ट मान्सूनच्या परतीचा प्रवास हा पूर्वोत्तर मान्सूनच्या प्रारंभाशी संबंधित आहे. सध्याच्या मान्सून परिस्थितीनुसार पूर्वोत्तर मान्सूनच्या आगमनासाठी 10-15 दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साऊथ वेस्ट मान्सूनची माघार 10-15 दिवसांसाठी वाढण्याची शक्यता आहे.”
– सिंकंदर जमादार, इंडियन मेटेरोलॉजिकल सोसायटी