मुंबई- महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पुढील काही दिवसांत मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तसेच प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी रेड अलर्ट, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या मान्सूनने महाराष्ट्रात दक्षिण भागासह पुणे, रायगड, अलिबाग या परिसरात धडक मारली आहे. आता मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. असे असताना मागील तीन दिवसांपासून मुंबईला पूर्व मोसमी पावसाने झोपडून काढले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते तुंबल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यावर्षी देशात 101 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मान्सून दाखल होण्यापूर्वीच मुंबईची तुंबई व्हायला सुरुवात झाली आहे. मागील 12 तासांत मुंबईत 140 ते 160 मिली इतका पाऊस झाला. तर 24 तासांत 500 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची पुरती धांदल उडाली आहे. यानंतर आता पुढील तासांत आणखी पावसाची तीव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.