पुणे (प्रभात वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आज झालेली ऑनलाईन अधिसभेची बैठक राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे चांगलीच गाजली. विद्यापीठात अर्थसंकल्प सादर करताना ठराविक लोकांना संधी दिली जाते. विद्यापीठात ठराविक लोकांना विशिष्ट महत्त्व दिले जाते, असा गंभीर आरोप करीत अधिसभा सदस्य अमित पाटील यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांच्यावर निशाणा साधला.
विद्यापीठाच्या वृक्षारोपणाच्या उपक्रमात राजेश पांडे, प्रसार माध्यमात बोलायला तेच, ऑनलाईन कार्यक्रमात, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमातही राजेश पांडेच दिसतात. त्यांच्याकडे भाजपची, “एमएनजीएल’ची जबाबदारी आहे, आता विद्यापीठाचा अर्थसंकल्प ही तेच मांडले आहेत. विद्यापीठात सर्व कामाची जबाबदारी पांडे यांनाच का दिली जाते? असा प्रश्न उपस्थित करीत अन्य सदस्यांनाही कुलगुरूंनी संधी दिली पाहिजे, याकडे अमित पाटील यांनी लक्ष वेधले.
पाटील यांच्या राजकीय वक्तव्याचे पडसाद अधिसभेत उमटले. अधिसभेत राजकीय विषय उपस्थित करणे योग्य नसल्याचे अधिसभा सदस्य गिरीश भवाळकर यांनी नमूद केले. तसेच सदस्य देविदास वायदंडे यांनी ही विद्यापीठात ठराविक लोकांना महत्त्व दिले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पहिल्याच ऑनलाईन बैठकीत राजकीय वादाने सकाळचे सत्र गाजले.
दरम्यान, “अर्थसंकल्प मांडताना विद्यापीठ हे राजकारणापलिकडे आहे. येथे वैचारिक दृष्टीकोन ठेऊन काम केले जाते. पक्ष, संघटनेचा इथे संबंध न आणता सर्वजण एकत्र काम करतात. विद्यापीठात प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी कल्पना मांडावी लागते, पुढाकार घेऊन उपक्रम सुरू करावा लागतो,’ असे सांगत राजेश पांडे यांनी या विषयावर पडदा टाकला.