पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असली तरी राजकीय वर्तुळात अद्यापही शांतताच आहे. तीन सदस्यीय वॉर्डरचनेनुसार निवडणूक होणार असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षांतर करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी त्यासाठी दिवाळीनंतरचा “मुहूर्त’ शोधला आहे. दिवाळीपूर्वी वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार होताच पक्षांतराचे “बार’ उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मार्च-2022 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात येत आहे. त्यामुळे फेब्रुवारी-2022 मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र राज्य शासनाने तीन सदस्यीय वॉर्ड रचनेचा निर्णय घेतल्याने सर्वांचीच अडचण झाली आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही वर्ष 2011 च्या लोकसंख्येनुसार होणार आहे. जनगणनेचे ब्लॉक हे 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच असणार आहेत. मात्र गतवेळच्या वॉर्ड संख्येत 11 ने भर पडणार आहे. प्रत्येक वॉर्ड हा 40 हजार लोकसंख्येचा असणार आहे.
गतवेळी ही संख्या 50 हजार होती. त्यामुळे संपूर्ण वॉर्डरचनाच बदलली जाणार आहे. कोणता भाग कोणत्या वॉर्डाला जोडला जाणार हे निश्चित नसल्याने आजी-माजी नगरसेवकांसह नव्याने निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांचीही गोची झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात लक्ष घातल्याने भाजपासह इतर पक्षातून राष्ट्रवादीत येण्यास अनेक जण इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीतीलही काही जण भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र वॉर्डरचनेचा अंदाजच येत नसल्याने सर्वांचीच “गोची’ झाली आहे. त्यातच महिला आरक्षण हा देखील कळीचा मुद्दा ठरणार आहे. जोपर्यंत वॉर्डरचना होणार नाही, तोपर्यंत कोणतीच उघड भूमिका घ्यायची नाही, अशीच स्थिती सर्वच पक्षातील इच्छुकांमध्ये दिसून येत आहे. पर्यायाने, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण अद्यापही शांत आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत महापालिकेकडून कच्चा आराखडा तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर प्रारुप आराखडा निश्चित होणार आहे. साधारण पुढील 15 दिवसांच्या कालावधीत वॉर्डरचनेचे स्वरुप इच्छुकांच्या समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीपुर्वी तरी राजकीय वातावरण शांतच राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पक्षांतराचे मुहूर्त साधले जातील, असे राजकीय पटलावर बोलले जात आहे. सध्या तरी वॉर्डरचना आणि आरक्षणावरून इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता पाहण्यास मिळत आहे.
मतदारांची संख्या वाढणार
सन 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार होती. सध्या शहराची लोकसंख्या 27 लाखांवर पोहोचली आहे. 2011 च्या लोकसंख्येवर वॉर्डरचना होणार असली तरी मतदारांची संख्या मात्र सन 2017 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या शहरातील मतदारांची संख्या ही 13 लाख 38 हजारांवर पोहोचली आहे. मतदार नोंदणी जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने आणखी एक लाख मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे. त्याचा फटका उपनगरामध्ये बसणार आहे. गावठाणातील वॉर्डामध्ये 25 ते 30 हजार मतदार असू शकतात. तर उपनगरांमधील वॉर्डांमध्ये मतदारांची संख्या ही 55 ते 60 हजारांपेक्षाही अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे