कोल्हापूर : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बिष्णोई टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. या टोळीतील शाम उर्फ शामलाल गोरधनराम पुनिया-बिष्णोई, श्रीराम पाचाराम बिष्णोई, श्रवणकमार मनोहरलाल मांजू उर्फ बिष्णोई या तिघांना पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. या बिष्णोई टोळीवर गंभीर स्वरुपाचे 45 गुन्हे दाखल आहेत.
खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, लूटमार, दहशत मावणे, अवैध पद्धतीने घातक शस्त्रे बाळगणे, पोलिसांवर हल्ला करणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजस्थानच्या 007 बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांवर पिस्तूल चालवून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तयार केला होता.
दरम्यान, टोळीचा म्होरक्या शामलाल पुनिया हा त्याच्या दोन साथीदारांसह 28 जानेवारीस बेळगावहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. पुणे-बेंगलोर महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ कोल्हापूर पोलिसांनी या टोळीला सापळा रचून जेरबंद केले. या टोळीवर राजस्थानात 45 गुन्हे दाखल आहेत.