पुणे – वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिझवान पठाण टोळीतील 16 जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने या भागात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे.
टोळीप्रमुख रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण, अजिम ऊर्फ आंट्या मोहंमद शेख, एजाज सत्तार पठाण, तनविर शकील शेख, राजेश दिलीप पवार, सोहेल अनिस पठाण, सद्दाम सलीम पठाण, नदीम बाबर खान, मतिन हकीम सय्यद, इम्तियाज खाजा पठाण, एजाज युसूफ इनामदार पटेल, अजिंक्य ऊर्फ चिम्या बाळासाहेब उंद्रे, ऋषीकेश ऊर्फ ऋष्या अनिल सोनवणे, जैद कलीम बागवान, शाहरूख ऊर्फ अट्टी रहिम शेख आणि उबेर अन्सार खान (सर्वजण, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी मोक्का लावलेल्या सोळा जणांची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी रिझवान याची टोळी असल्याचे गुन्ह्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.
अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी वरील आरोपींना मोक्का लावण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील भोसले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे.