पुणे – हिंदू राष्ट्र सेना प्रमुख धनंजय जयराम देसाईसह 21 जणांना विशेष न्यायाधीश एस.बी.साळुंखे यांनी दिलासा दिला आहे. संगणक अभियंता मोहसीन शेख याच्या खूनप्रकरणातून सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. घटनेनंतर आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
फेसबुकवर महापुरुषांची बदनामी झाल्यानंतर हडपसर भागात दोन जून 2014 रोजी दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये संगणक अभियंता मोहसीन शेख (वय 26, रा. हडपसर, मूळ. सोलापूर) याचा खून केल्याचा आरोप होता. याबाबत मोहसीन याचा भाऊ मोबिन महम्मद सादिक शेख (वय 28) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अमीन हरुन शेख (वय 30, रा. हडपसर) आणि एजाज याकूब बागवान (वय 26, रा. सोलापूर) या दोघांनाही जमावाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार देसाई याच्यासह इतर आरोपींना अटक झाली होती.
देसाईच्या वतीने ऍड. मिलिंद पवार यांनी काम पाहिले. इतर आरापींच्या वतीने ऍड. सुधीर शहा, ऍड. जे. एन. पाटील,ऍड. डी. एस. भोईटे, ऍड. मनीष पाडेकर, ऍड. अमोल काळे आणि ऍड. राहुल भरेकर यांनी काम पाहिले. शेख मूळचा सोलापूरचा रहिवासी होता. तो एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता. महापुरुषांची बदनामी झाल्यानंतर उफाळलेल्या दंगलीत शेख याच्यावर वार करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.