नवी दिल्ली : मुंबईतील क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, आर्यन खानच्या अटकेमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्जचा वापर यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय देशात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत असून सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंबंधी मोठी चिंता व्यक्त केली आहे. तसेच या संबंधी मोठे वक्तव्य देखील केले आहे.
उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. यावेळी भागवत यांनी भारतीय कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगताना पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते असे सांगितले. तसेच ही मूल्यं नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला.
“लोकांना आपलं गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवलं. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केलं. आपल्या देशातही हेच सुरु आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणं पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिलंत तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल,” असं मोहन भागवत म्हणाले आहेत.
मी यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा केलेला नाही. एका प्रतिष्ठित कुटुंबातून असून माझे आईवडील आणि भावंडे मुंबईतच राहतात. माझ्याकडे भारतीय पारपत्रही आहे. त्यामुळे फरारी होणार नाही, शिवाय पुरावे नष्ट करण्याचा प्रश्नच नाही. या प्रकरणी एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले असून या सगळ्यांचा विचार करून जामीन देण्याची विनंती आर्यनच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली होती.
दरम्यान, अमली पदार्थ प्रकरणात १० जाणांना अटक करण्यात आली होती, परंतु त्यापैकी दोघांना काही तासांनंतर लगेच सोडून देण्यात आले, त्यात भाजपा नेत्याच्या एका नातेवाईकाचा समावेश होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी (एनसीबी) पथकाच्या अधिकाऱ्यांवर केला.