नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दिल्लीतील मशीद भेटीवरून काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, अशी म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच भागवत यांची इमामांसोबतची भेट दाखवण्यापूर्ती होती, अशी टीका सिंह यांनी केली आहे.
याविषयी बोलताना दिग्विजय सिंग यांनी,“जोपर्यंत मोहन भागवत मॉब लिंचिंगचा बळी ठरलेल्या अखलाखच्या कुटुंबीयांची भेट घेत नाहीत आणि बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्यांच्या सत्काराविरोधात बोलत नाहीत, तोपर्यंत भागवत यांनी इमामांची घेतलेली भेट ढोंग आहे” असे देखील त्यांनी म्हटले आहे. “निरपराध मुस्लिमांच्या छळाबाबत तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची माफी मागितल्यास, त्यांना न्याय मिळवून दिल्यास आम्ही आरएसएस वेगळा विचार करत आहे यावर विश्वास ठेवू”, असे सिंह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ही भेट ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी २२ सप्टेंबरला दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली होती.
यावेळी त्यांनी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर इलयासी यांनी मोहन भागवतांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख केला होता. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.