मुंबई – मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आणि यासाठीच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या लढवय्या आणि पराक्रमी मावळ्यावर आधारित ‘पावनखिंड’ गाजवणाऱ्या बाजीप्रभूंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर सध्या पाहायला मिळत आहे.
18 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवला असून, ओपनिंग आठवड्यापासूनच या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. अजूनही या कमाईचा आकडा वाढत चालला आहे. तमाम शिवप्रेमी आणि मराठी रसिक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सिनेमागृहांमध्ये ‘पावनखिंड’च्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
अश्यातच आता, ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी मोहन भागवत यांनी संपूर्ण टीमचे आणि चित्रपटाचे कौतुक केले. “हा चित्रपट अत्यंत सरस झालाय आणि खूपच परिणामकारक आहे, असं लक्षात येतंय.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
View this post on Instagram
“छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा येणाऱ्या सर्व पिढ्यांना, आपल्याला, आपल्यानंतरच्या पिढ्यांना स्वाभिमान आणि संजीवनी देणारं आहे. त्यामुळे ते सर्वांसमोर आलं पाहिजे आणि योग्य रितीने आलं पाहिजे, इतिहास म्हणून आला पाहिजे. त्याबरोबर त्याचा जो भावनात्मक आशय आहे, किंवा संस्कार आहे, तो आला पाहिजे. त्या दृष्टीने हा चित्रपट अत्यंत सरस झालाय आणि खूपच परिणामकारक आहे, असं लक्षात येतंय..” असं ते म्हणाले.
दरम्यान, ’पावनखिंड’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले असून चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसून आला आहे. चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा सिनेरसिकांना पाहायला मिळाला आहे.