मी मोगरा… बहरून यावे, अत्तरांच्या श्वासापरी… मोगरा फुलतो तेव्हा त्याचा दरवळ साऱ्या आसमंतात ओसंडतो. बऱ्याचदा त्या मोगऱ्यालाही हे माहीत नसतं की, आपलंही एक सुवासाचं जग आहे म्हणून… याच त्याच्या अजाण जाणिवेत तो लपतो पानांच्या आड… शुभ्रपणाच्या कोंदणात…
मनाचंही तसंच असतं ना! थोड्याफार फरकानं आपण कोण आहोत, आपल्याला काय हवंय? हेच नेमकं माहीत नसतं बऱ्याचदा आणि मग आपण धावत सुटतो. कुठे थांबायचं हेही कळत नाही. वेळ गेल्यानंतर कळतं नेहमी, की जो सुटून गेला तो क्षण किती सुखकर होता. असं कितीदा होतं ना! असलेल्या क्षणांत आपण सुखी असल्याचं समजतच नाही. मग उमजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते, अर्थात, आताचे उद्या नाही, तेव्हा आहे तो प्रत्येक क्षण जगून घ्यावा आणि कधीतरी अचानक तो क्षण येतो… क्लिक होतं… अरेच्चा! हे जे आपण सध्या आहोत ते आपण नव्हतोच कधी… हाच तो क्षण, हीच ती वेळ… मनाचा मोगरा फुलण्याची सुरुवात…
मग स्वत:साठी जगण्याची गरज भासू लागते. स्वत:चाच दरवळ अनुभवावासा वाटतो. रिमझिमत्या ओल्या सांजवेळी नि:शब्द साथ हवीहवीशी वाटू लागते. कधी कोऱ्या कागदावर कविता उमटू लागते, तर कधी चित्रात रंग भरले जातात. उमर खय्यामची गझल नकळत ओठांवर फेर धरायला लागते… तर कधी मनात गुलजार मोहरतो… “चल, आ तेरे पैरोंपे मरहम लगा दूँ ए दिल.., कुछ चोटे तुझे भी आयी होंगी ठोकरें खाकर…’
खरंच हे फुलणं आणि उमलणं यासाठी कुठून येत असेल ही ऊर्जा? लाखो दरवाजे असतानाही एकच वाट का दिसते मग प्रकाशलेली? हे सगळे प्रश्न उत्तरांत बदलले जातात आणि अर्थवाही होताना आजूबाजूला एखाद्या निर्जीव क्षणांत कोवळं आभाळ पुन्हा दाटून येतं आणि जाणवतं शरीराच्या आत लपलेलं अजून एक अदृश्य शरीर.
तर मोगरा फुलतो आणि त्याच्या इवल्याशा वेलाला धुमारे फुटायला लागतात स्वत्वाचे. स्वत:च्या प्रेमात पडायला लव्हस्टोरीचे खंड नाही वाचायला लागत. त्यासाठी ताऱ्यांनी लगडलेलं आभाळही पुरेसं आहे. सोबत एखाद्या गाण्याची अलवारशी लकेर असावी. क्या बात है..! मस्त ना? आणि मग शोधावं स्वत:ला बिनधास्त. सापडत जातात चित्रात एकेक रंग, गायलं जातं रिमझिमत्या स्वरांचं एखादं गाणं… मोगरा फुलतो.
तुझ्या अक्षरांचा जसा गंध आहे
तशी मी मनातून पालवते आहे,
तुझ्या स्पंदनांचे बहर माळताना
श्वासात गाणे जपलेच आहे,
कधी तू मिळावे सुरांच्या तिरी
कधी सापडावे तू साजामध्येही,
फुलांनी रचावे तराणे तुझे रे
ऋतूंनी करावे उमलसण साजरे
मी स्वप्न बघते माझ्याच स्वप्नांचं…
मनातल्या वाफ्यात लावलेय मी रोप स्वप्नांचं. कधी बहरेल, कधी फुलेल माहीत नाही. त्याचा हंगाम कोणता माहीत नाही. इतकंच जाणते की, मला ते रोप जगवायचंय, जपायचंय. माझं अस्तित्व त्या स्वप्नांमधून मनाच्या मातीत रुजवायचंय आणि फुलवायचीत स्वप्ने अगणित. प्रेम, आनंद, माया यांची. जपायचेत हे फुटलेले धुमारे मनाच्या मातीत. मग मोगरा फुलेल… नक्की फुलेल..!
ऊन-सावली
मानसी चिटणीस