नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चांगले नागरिक नाहीत. मी माझ्या अल्पसंख्याक बंधू, भगिनींना सांगू इच्छितो की, जर तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिले तर नव्या समस्या निर्माण होतील अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली.
मोदी यांनी बाहुबली चित्रपटात विरोधी भूमिका निभावणाऱ्या भल्लाळदेवशी नायडू यांची तुलना केली होती. त्याला नायडू यांनी प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले की, मोदी दिलेली आश्वासने पूर्ण तर करतच नाहीत पण नोटाबंदी, जीएसटीसारखे प्रश्न निर्माण करतात.
यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी गुजरात दंगलीचा उल्लेख केला. नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा मी पहिला होतो. यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर बंदी घातली. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
याआधी 1 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांनी वारंवार टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करत यू-टर्न बाबू असल्याचा टोला लगावला होता. टीडीपी लोकांचा डेटा चोरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मला सांगण्यात आले आहे की, टीडीपीने सायबर क्राइमशी संबंधित सेवा मित्र ऍप सुरू केले आहे. हे ऍप ना सेवा करत आहे, ना मित्र आहे. हे ऍप लोकांचा डेटा चोरत आहे, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता.