नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील करोना संकट हाताळणीवरून योगी आदित्यनाथ सरकारची प्रशंसा केली. मात्र, मोदींच्या प्रशस्तीपत्रामुळे सत्य दडणार नाही, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्या घडामोडीची खिल्ली उडवली.
करोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी उत्तर प्रदेश सरकारने निष्ठुरता, बेपर्वाई दाखवली. जनतेला यातनांना आणि असाह्यतेला सामोरे जावे लागले. ते सत्य मोदी आणि योगी विसरू शकतात. मात्र, करोनाच्या यातना सहन करणारी जनता ते विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रियांका यांनी ट्विटरवरून दिली.
दरम्यान, उत्तर प्रदेश दौऱ्यासाठी प्रियांका शुक्रवारी लखनौमध्ये दाखल झाल्या. विविध मुद्द्यांवरून योगी सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ काही काळ धरणे धरून मौन व्रत पाळले.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसच्या सज्जतेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने प्रियांका यांच्या दौऱ्याचे महत्त्व आहे. त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्याशिवाय शेतकरी नेत्यांशीही संवाद साधणार आहेत.