वायनाड: सध्या आपल्या केरळातील वायनाड मतदार संघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे दुसऱ्या दिवशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार खोटारडेपणा, विखारी आणि द्वेषमुलकपणाचा होता. पण या पार्श्वभूमीवर आपला पक्ष मात्र सत्य, प्रेम आणि सद्भावना या गुणांचीच कास धरेल असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या मतदार संघातील कलपेट्टा, कलबालाकाडू आणि पनामारम या भागात रोड शो करीत मतदारांशी संवाद साधला आणि त्यांचे आभार मानले.
यावेळी राहुल गांधी यांच्या समवेत कॉंग्रेसचे केरळचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल, केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रमेश चेन्नीथला, केरळ प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष एम रामचंद्रन हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी वायनाडच्या जनतेचे आभार मानताना ते म्हणाले की सर्वच पक्षातील लोकांना एकत्र घेऊन मी वायनाडचे प्रश्न सोडवण्याचे काम करीन. वायनाड मध्ये राहुल गांधी हे तब्बल 4 लाख 31 हजार मतांनी निवडून आले आहेत.
केरळात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अभुतपुर्व यश मिळाले असून येथे पक्षाने 20 पैकी तब्बल 19 जागा जिंकल्या आहेत. मोदींच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की मोदींकडे आज पैसा असेल, त्यांच्याकडे प्रसार माध्यमेही असतील किंवा त्यांच्या बाजुला त्यांचे श्रीमंत मित्रही असतील पण भाजपच्या असहिष्णुतेच्या विरोधात आम्ही लढत राहु.