नवी दिल्ली- वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री वार.एस. जगनमोहन रेड्डी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्याला विशेष दर्जा मिळण्याबाबत चर्चा केली. तसेच आंध्रप्रदेशच्य आर्थिक स्थितीबाबतही त्यांनी चर्चा केली आणि केंद्रीय निधी मिळण्याची अपेक्षाही केली. येत्या 30 तारखेला रेड्डी यांचा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून विजयवाडा येथे शपथविधी होणार आहे. त्या समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही जगनमोहन रेड्डी यांनी मोदींना दिले. रेड्डी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली आणि आंध्रप्रदेशच्या विशेष मागण्यांसंदर्भात पाठिंबा मिळण्याची मागणी केली.
आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, ही वायएसआर कॉंग्रेसची प्रमुख मागणी आहे. निवडणुक प्रचारादरम्यान रेड्डी आणि त्यांच्या पक्षाने याच मागणीवर भर दिला होता. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला गेल्यास भाजपला राष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देण्याची तयारी रेड्डी यांनी दर्शवली आहे. लोकसभेच्या निवडणुकीबरोबर आंध्रात विधानसभेच्याही निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसला मोठे बहुमत मिळाले आहे. शनिवारी वायएसआर कॉंग्रेसच्या बैठमीत जगनमोहन रेड्डी यांना एकमताने विधीमंडळ नेते म्हणून निवडण्यात आले आहे.