पणजी – गोव्यातील लोकांचे लक्ष पर्यावरण आणि रोजगार यासारख्या खऱ्या समस्यांवरून अन्यत्र विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवला आहे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मनात आणले असते तर 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही तासांतच त्यांनी गोवा मुक्त केला असता, पण नेहरूंमुळेच गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास विलंब झाला असा आरोप मोदींनी केला. या त्यांच्या विधानावर टीका करताना गांधी म्हणाले की, पंतप्रधानांना त्या काळातील परिस्थिती आणि दुसऱ्या महायुद्धानंतर काय घडले होते या इतिहासाची माहिती नाही.
मडगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना गांधी म्हणाले, पंतप्रधानांना त्यावेळचा इतिहास समजत नाही, दुसऱ्या महायुद्धानंतर काय चालले होते ते त्यांना कळत नाही. लोकांचे लक्ष अन्यत्र भरकटवण्यासाठी ते असे विषय उपस्थित करीत असतात. पर्यावरणासारख्या, रोजगारासारख्या खऱ्या समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते गोव्यात येत असतात असे त्यांनी नमूद केले.
सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, गोव्यातील लोकांचे लक्ष अन्यत्र विचलित करणाऱ्या अन्य कोणत्याही मुद्द्यावर मी भाष्य करणार नाही. ते म्हणाले,गोव्यातील लोकांसाठी काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे हे माझे ध्येय आहे. गोव्यात आम्हाला दुसऱ्या कोणत्याही पक्षाची मदत घेण्याची वेळ येणार नाही, येथे आम्ही पुर्ण बहुमतातील सरकार स्थापन करू असा दावाही त्यांनी केला.