लखनौ – तृणमुल कॉंग्रेस पक्षाचे चाळीस आमदार आपल्या संपर्कात आहेत असे विधान पंतप्रधानांनी करणे अत्यंत लाजीरवाणे असून या आक्षेपार्ह विधानाची दखल घेऊन निवडणूक आयोगाने त्यांच्यावर 72 वर्षांची प्रचार बंदी लागू करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे.
निवडणूक प्रचारात आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल अलिकडेच निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिद्धु यांच्यावर 72 तासांची निवडणूक प्रचार बंदी लागू करण्यात आली होती त्या अनुषंगाने त्यांनी ही मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की तुम्ही प्रधानमंत्र्यांचे ते निर्लज्ज भाषण ऐकले काय असे विकास विचारत आहे. 125 कोटी जनतेचा विश्वास गमावल्यानंतर ते आता चाळीस आमदारांच्या पक्षांतराचे अभिवचन देत प्रचार करू लागले आहेत. त्यातून त्यांची ब्लॅक मनी मेंटॅलिटी दिसून आली आहे. त्यांच्यावर आता 72 तासांची नव्हे तर 72 वर्षांची बंदी घातली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
काल पश्चिम बंगाल मधील प्रचार सभेत बोलताना मोदींनी हे प्रतिपादन केले होते. तृणमुल कॉंग्रेसनेही मोदींच्या या विधानाबद्दल त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे घोडेबाजाराला प्रोत्साहन दिल्याची तक्रार केली होती.