नवी दिल्ली : केंद्र सरकारने आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांवरून हल्लाबोल सुरू केला आहे. जीडीपीची ऐतिहासिक घसरण, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवत राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ सुरू केली असून, दुसऱ्या भागात पंतप्रधान मोदी यांच्यावर नोटबंदीच्या निर्णयावरून टीकेची तोफ डागली आहे.
‘अर्थव्यवस्था की बात’ व्हिडीओ मालिकेतील दुसरा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. यात त्यांनी “मोदीजींचा कॅशमुक्त भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे. जो फासा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी टाकण्यात आला होता, त्याचा भयंकर परिणाम ३१ ऑगस्ट २०२० रोजी समोर आला आहे. जीडीपी घसरण्याबरोबरच नोटबंदीने देशाची असंघटित अर्थव्यवस्था तोडली,” असे राहुल गांधी यांनी व्हिडीओ ट्विट करताना म्हटले आहे.
मोदी जी का ‘कैश-मुक्त’ भारत दरअसल ‘मज़दूर-किसान-छोटा व्यापारी’ मुक्त भारत है।
जो पाँसा 8 नवंबर 2016 को फेंका गया था, उसका एक भयानक नतीजा 31 अगस्त 2020 को सामने आया।
GDP में गिरावट के अलावा नोटबंदी ने देश की असंगठित अर्थव्यवस्था को कैसे तोड़ा ये जानने के लिए मेरा वीडियो देखिए। pic.twitter.com/GzovcTXPDv
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 3, 2020
“नोटबंदी भारतातील गरीब, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांच्यावरील आक्रमण आहे. नोटबंदी भारताच्या असंघटित अर्थव्यवस्थेवरील आक्रमण होते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. पाचशे हजार रुपयांची नोट रद्द करण्यात आली. संपूर्ण भारत बँकांसमोर जाऊन रांगेत उभा राहिला. लोकांनी आपला पैसा, दररोजची कमाई बँकेत जमा केली. मग पहिला प्रश्न असा की, काळा पैसा नष्ट झाला का? तर नाही. दुसरा प्रश्न भारतातील गरीब जनतेला नोटबंदीमुळे कोणता फायदा झाला? तर उत्तर आहे काहीच नाही,” असे राहुल गांधी म्हणाले.
“मग फायदा कुणाला मिळाला? भारतातील सर्वात मोठ्या करोडपतींना याचा फायदा झाला. सामान्य जनतेचा पैसा त्यांच्याकडून काढून त्याचा उपयोग सरकारनं या लोकांची कर्ज माफ करण्यासाठी केला. तो फक्त एक उद्देश होता. यात दुसरा छुपा उद्देशही होता. देशातील जी असंघटित अर्थव्यवस्था आहे, ती रोखीनं (पैशाची देवाण घेवाण) चालते. छोटे दुकानदार, मजूर, शेतकरी हे रोखीनंच व्यवहार करतात. या क्षेत्रातून रोख पैसा काढून घेणं, हाच दुसरा उद्देश होता.
पंतप्रधानांनी स्वतः सांगितले की, त्यांना कॅशलेस भारत हवाय. मग कॅशलेस हिंदुस्थान झाला, तर असंघटित अर्थव्यवस्थाच नष्ट होईल. नुकसान कुणाचे झाले? जे रोखीच्या पैशाने व्यवहार करतात असे छोटे व्यावसायिक, मजूर, शेतकरी यांचे नुकसान झाले. जे रोख (कॅश) असल्याशिवाय जगूच शकत नाहीत. नोटबंदी भारतातील गरीब, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांच्यावरील आक्रमण होतं. नोटबंदी भारताच्या असंघटित अर्थव्यवस्थेवरील आक्रमण होतं. हे आक्रमण आपल्याला ओळखावं लागेल. संपूर्ण देशाला यांच्याविरोधात लढावं लागेल,” असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.