नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलैला सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हर्च्युअल संवाद साधणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यांच्यात करोना संकटामुळे सध्या संबंधित राज्यांमध्ये असलेल्या स्थितीबाबत चर्चा होईल.
केरळ, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री त्या चर्चेत सहभागी होतील. संबंधित राज्यांतील काही जिल्ह्यांत करोनाबाधितांची संख्या वाढत आहे किंवा इतर राज्यांप्रमाणे तिथे बाधित संख्या घटताना दिसत नाही.
मोदी यांनी मंगळवारी ईशान्येकडील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. देशात करोना संकट उद्भवल्यापासून मोदी सातत्याने मुख्यमंत्र्यांशी व्हर्च्युअल संवाद साधत आहेत. करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आल्याने त्या संवादाला महत्व आहे.