नवी दिल्ली -करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर देशव्यापी लॉकडाऊनच्या मुदतीविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.
मोदींनी याआधी 20 मार्चला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर 24 मार्चला 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलला समाप्त होणार आहे. मात्र, सध्या देशभरात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध राज्यांबरोबरच तज्ञांकडून लॉकडाऊनची मुदत वाढवण्याला अनुकूलता दर्शवली जात आहे. मोदी यांच्याबरोबरच केंद्र सरकारच्या पातळीवरून मुदत वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याच्या घडामोडीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यावेळी करोना फैलावाशी निगडीत इतर मुद्द्यांवर आणि उपाययोजनांवरही चर्चा होईल.
करोना फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सरसावली आहेत. त्यामुळे करोनाविरोधी लढ्यासाठी संपूर्ण देश एकवटल्याचे चित्र आहे.