नगर – मोगल, ब्रिटिश व कॉंग्रेसच्या काळातील भारताचा गुलामीचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, असा दावा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरतसिंह रावत यांनी बुधवारी येथे केला. पंतप्रधान मोदी भारताची विश्व भारत प्रतिमा करीत आहेत. नवा भारत होत आहे व येणारा काळ आपला आहे, असा दावाही रावत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त भाजपद्वारे 30 मे ते 30 जून या महिन्याभराच्या काळात देशभरात महा जनसंपर्क अभियान राबविले जाणार आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील या अभियानाचे निरीक्षक रावत व मध्यप्रदेशचे पर्यटन विभाग अध्यक्ष विनोद गोटिया आहेत. या दोघांनी बुधवारी कोहिनूर मंगल कार्यालयात दक्षिण नगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिकाताई राजळे व बबनराव पाचपुते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते.
रावत म्हणाले, भारताच्या पंतप्रधानाचे परदेशात याआधी कधीही जंगी स्वागत होत नव्हते. तेथील प्रशासनाचे अधिकारी त्यांच्या स्वागताला यायचे. मात्र, आता युग बदलत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात, तेव्हा त्यांच्या स्वागताला तेथील राष्ट्राध्यक्ष येतात व त्यांच्यासमोर नतमस्तकही होतात,हा बदल होत आहे. 55 वर्षात कॉंग्रेसने देशाला फसवले, तोडले व समाजाला लुटले आहे.
मात्र, आता जनता समजदार झाली असून मोदी है तो मुमकिन है यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे महिन्याभराच्या काळात घर घर संपर्क अभियान, लाभार्थी संमेलन, बूथ सक्षमीकरण अशा सर्व उपक्रमात जनतेशी संवाद साधा व त्यातून येणारा काळ आपला आहे हे सिद्ध होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. दक्षिण जिल्हाध्यक्ष मुंडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांनी केले. सचिन पोटरे यांनी आभार मानले.
आता महिनाभर कार्यक्रम नको
राज्यात आता आपले सरकार आहे, त्यामुळे राज्याच्या योजना अंमलबजावणी, सरल प डाऊनलोड करून त्याद्वारे संपर्क अभियान, बूथ सक्षमीकरण व आता महासंपर्क अभियान यामुळे पक्ष व सरकारची खूप कामे एकाच वेळेस आली आहे. त्यामुळे आता किमान एक महिनाभर तरी नवीन कामे पक्षाने देऊ नये अशी कार्यकर्त्यांच्या मनात भावना आहे, असा दावाही खासदार विखे यांनी केला. त्यांच्या या भूमिकेला पक्षनिरीक्षक गोटिया यांनीही सूचक प्रतिसाद देत संघटन व सरकारची कामे यामुळे ओव्हर लॅपिंग होत असल्याचे दिसते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.