जबलपूर – केंद्रीय मंत्री विरेंद्रकुमार खटीक यांनी देशातील करोना लसीकरण मोहिमेवरून शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मोदींनी वैद्यकीय संशोधनासाठी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना प्रेरित केले. परिणामस्वरूप, भारतात करोनावरील लस विकसित झाली, असे ते म्हणाले.
जन आशीर्वाद यात्रेसाठी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये दाखल झालेले खटीक पत्रकारांशी बोलत होते. कुठल्या विषाणूशी लढण्याच्या उद्देशातून लस प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदाच भारताला इतर कुठल्या देशावर अवलंबून राहण्याची गरज भासली नाही. त्याउलट, पोलिओ लसीकरणाबाबत घडले.
अनेक देशांत पोलिओ लसीकरण पूर्ण झाल्याच्या तीन-चार वर्षांनंतर भारतात ते सुरू झाले, असा दावा त्यांनी केला. देशातील करोना लसीकरण मोहिमेने सध्या गती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर, लसींची उपलब्धता आणि लसीकरण मोहीम यासाठीचे श्रेय खटीक यांनी मोदींना दिल्याचे मानले जात आहे.
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी देशभरात जन आशीर्वाद यात्रा हाती घेतली आहे. मोदी सरकारची कामगिरी जनतेपुढे मांडणे हा त्या यात्रेमागचा उद्देश आहे.