चंडीगढ – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीत केंद्रीय कृषी कायदे तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पंजाबचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे.
केंद्रीय कृषी कायदे आणि त्याविरोधातील शेतकरी आंदोलन या मुद्द्यांवर मतैक्य घडवण्यासाठी अमरिंदर यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्या बैठकीवर केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने बहिष्कार टाकला. तर, आपने सभात्याग केला.
दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी पंजाब पोलीस तैनात करण्याची मागणी मान्य न झाल्याचे कारण आपकडून देण्यात आले. कॉंग्रेसबरोबरच शिरोमणी अकाली दल, बसप आणि डाव्या पक्षांचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले.
शेतकरी आंदोलनाची कोंडी फोडण्यास मोठा विलंब होण्यासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत मांडण्यात आली. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर संचलनावेळी झालेला हिंसाचार घडवून आणला गेला.
लाल किल्ल्यातील हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांत पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.