नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी हटवून देशातील नेमक्या स्थितीचे अवलोकन केले पाहिजे. त्यांना या चष्म्यातून दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रॉजेक्टच दिसतो आहे अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत दिल्लीत पंतप्रधानांचे अलिशान निवासस्थान, नवीन संसद भवन आणि अन्य नवीन इमारती बांधल्या जात असून त्यासाठी तब्बल 20 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे पैसे कोविड काळात देशातील आरोग्य व्यवस्थेवर खर्च केले जावेत, अशी मागणी कॉंग्रेसने अनेक वेळा केली आहे. त्याच अनुषंगाने राहुल गांधी यांनी आज ही पुन्हा टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की नद्यांमध्ये असंख्य कोविड मृतांचे मृतदेह वाहून येत आहेत.रुग्णालयांच्या बाहेर मैलोनमैल रांगा लागत आहेत. लोकांना जीविताचा हक्क नावाखाली लुटले जात आहे. आता मोदींनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी चष्मा हटवला पाहिजे, त्यांना यातून फक्त सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पच दिसतो आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी लोकांना गरजुंना मदतीचा हात देण्याचेही आवाहन केले आहे. या ट्विट सोबतच राहुल गांधी यांनी ऑक्सिजन, आयसीयुबेड आदींसाठी लोकांची सध्या जी ससेहोलपट सुरू आहे त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.