पणजी – नेहरूंमुळेच गोवा स्वतंत्र होण्यास विलंब लागला असा आरोप पंतप्रधान मोदींनी गोव्यातील प्रचार सभेत केला होता. त्याचा जोरदार समाचार ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नेहरूंनी योग्य वेळी गोव्यात हस्तक्षेप करून गोवा स्वतंत्र केला आहे. मोदी-शहांना कसलाच इतिहास माहिती नाही. अस्वस्थतेमुळे ते इतिहासाची मोडतोड करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचे ते प्रयत्न करीत आहेत पण गोव्यातील जनतेला सत्य माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या संबंधात पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, मोदी-शहांना दुसऱ्या महायुद्धानंतरचा इतिहास माहिती नाही. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासही त्यांना माहिती नाही. नेहरूंनी अत्यंत तत्परतेने जगात अलिप्तराष्ट्रांची संघटना कशी उभारली हा इतिहासही त्यांना माहिती नाही. नेहरूंनी योग्य वेळ येताच गोव्यात हस्तक्षेप करून गोवा मुक्त केला. म्हणूनच त्यावेळी नेहरूंनी जी लष्करी कारवाई गोव्यात केली त्याच्या विरोधात जगात एकाहीं देशाने आवाज उठवलेला नाही ही बाबही मोदी नेहरूंच्या ध्यानात येण्याची शक्यता नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
पुर्वी आमच्या आमदारांची गोव्यात फोडाफोडी झाली, पण यावेळी मात्र आम्ही येथे आमच्या घरावर जागरूक पहारा ठेवला आहे. तरीही चोर फिरणारच आहेत याची आम्हाला कल्पना आहे पण यावेळी त्यांना येथे काहीही करता येणार नाही असेही चिदंबरम यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार का जाहीर केलेला नाही असे विचारता ते म्हणाले की, त्याचा येथील प्रत्यक्ष निवडणूक निकालावर काहींही परिणाम होणार नाही कारण येथे तो मुद्दाच नाही. छोट्या पक्षांना मतदान करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपलाच मतदान करण्यासारखे आहे ही बाबही येथील जनता जाणून आहे. त्यामुळे सध्याची गोव्यातील लढत ही कॉंग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमधीलच लढत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.