पेगसस या इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून भारतातील अनेक पत्रकार, राजकीय नेत्यांच्या फोनवर पाळत ठेवली जात आहे, या आरोपाच्या संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी खुलासा केला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज ही मागणी केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकार आणि त्यांचे प्रशासन कमकुवत आहे याचाच दाखला यातून मिळतो आहे. लोकांमध्ये सध्या भयाचे वातावरण आहे, त्यामुळे आज उघड झालेल्या प्रकारामुळे आणखीनच धास्ती वाढली आहे त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यात स्पष्टीकरण देणे गरजेचे बनले आहे असे ते म्हणाले.
भारतातील किमान तीनशे जणांच्या फोन संभाषणावर इस्रायली यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती इंटरनॅशनल मीडिया कन्सॉरटियमने दिली आहे. या तीनशे जणांमध्ये दोन मंत्री, चाळीस पत्रकार, विरोधी पक्षांचे तीन नेते, एक विद्यमान न्यायाधीश आणि असंख्य कार्यकर्ते व व्यावसायिकांचा समावेश आहे.
तथापि, सरकारने हे वृत्त फेटाळून लावले असून त्याला कोणताही आधार नाही असा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे. तथापि, आम्ही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय लावून धरणार आहोत, असे राऊत यांनी सांगितले.