कोलकता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सातत्याने भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा उल्लेख बाहेरचे म्हणून करत आहेत. अशात भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बाहेरचे ठरवले.
ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या सिन्हा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. इतर पक्षांमधून आलेल्या नेत्यांच्या जोरावर भाजप निवडणुका लढवतो. भाजपकडे बंगालमध्ये ममतांशी मुकाबला करण्यासाठी विश्वासार्ह चेहरा नाही. त्यामुळे तो पक्ष बाहेरच्या मोदी-शहांवर अवलंबून आहे. केरळ, तामीळनाडू आणि पुदुच्चेरीत भाजपच्या विजयाची बिल्कूल शक्यता नाही. त्यामुळे तो पक्ष बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी अस्वस्थ झालेला दिसतो. आसाममध्ये भाजप आधीपासूनच सत्तेवर आहे. त्यामुळे तेथील त्या पक्षाचा विजय फार मोठी गोष्ट ठरणार नाही, असे त्यांनी म्हटले. बंगाल विधानसभा निवडणुकीतील तृणमूलचा विजय 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील बदलाची नांदी ठरेल, असे भाकितही सिन्हा यांनी केले.