मुंबई: कोरोनाशी लढण्यासाठी सरकारी यंत्रणा या दिवस रात्र काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला असून आज त्याचा ९ वा दिवस आहे. त्याच पार्शवभूमीवर आज सकाळी मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असे मोदींनी म्हटले आहे. मोदींच्या याच आवाहनावर आता सर्व स्तरातून टीका करण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर टीकास्त्र सोडले. “टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं. साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलां.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
👏👏टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते
आता आग 🔥नाही लावली म्हणजे झालं. 😅
साहेब कामाचं आणि लोकांच्या
पोटा पाण्याचं बोलां.— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2020
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील टीका केली. नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून देशवासियांच्या हाती घोर निराशा आली आहे. वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील. पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला”.