पुणे – भारत वेगाने विकसित होत आहे. जगभर भारताचा लौकिक वाढत आहे. पुढील काळात जगात मोठे बदल होणार असून, त्याचे नेतृत्व भारतच करेल. यामध्ये युवकांचे योगदान मोठे असेल. त्यामुळे आपल्याला जे काही येते, त्या माध्यमातून आपण देशासाठी योगदान द्यायला हवे, असे मत भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी शनिवारी व्यक्त केले
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे केसरीवाडा येथे आयोजित युवक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, शहराध्यक्ष राघवेंद्र उर्फ बापू मानकर, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, कुणाल टिळक, शिवानी दाणी, सुरेंद्र पठारे आदी यावेळी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते होते. त्यांनी दिलेली स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुःसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच प्रत्यक्षात आणली. आत्मनिर्भर भारत अंतर्गत पंतप्रधानांनी स्वदेशी चळवळीला बळ दिले. चिनी बनावटीच्या ऍपवर बंदी म्हणजेच बहिष्कार घालणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. तर साडेतीन दशकांहून अधिक काळानंतर राष्ट्रीय शिक्षण देणारे नवे शिक्षण धोरणही मोदींनीच आणले. भारतात लोकशाही असूनही सर्वत्र राजकीय पक्षांना घराणेशाहीमुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वरूप आले होते. अशा परिस्थितीत एक चहावालादेखील देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे मोदींनी सिद्ध केले,’ असे सूर्या म्हणाले.
तेजस्वी सूर्या या नावातच दम आहे. त्यांच्या संसदेतील अभ्यासपूर्ण मांडणीतून ते समोर येते, असे बापट म्हणाले. मुळीक यांनीही सूर्या आणि युवा मोर्चाच्या कामाचे कौतुक केले.