मुंबई: भारताचा पाकिस्तान नव्हे, तर चीन हाच खरा शत्रू असून पाकपेक्षा चीनकडूनच भारताला सर्वाधिक धोक आहे, अशा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी दिली आहे. तसेच चीनबरोबरचा संघर्ष लष्करी ताकदीने सुटणार नसून तो डिप्लोमॅटिक पद्धतीनेच सोडवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ते आज बोलत होते. शरद पवार म्हणाले, भारतीय लोक पाकिस्तानला पहिला शत्रू मानतात. मात्र भारतात संकट निर्माण करण्याची ताकद चीनमध्येच आहे. पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी शक्तीत मोठा फरक आहे. चीनच्या शत्रुत्वाचा खूप दीर्घ परिणाम होणार आहे.
लष्करीदृष्ट्या चीन आपल्यापेक्षा दहापट ताकदवान आहे. 30 वर्षांपूर्वी भारत चीनचं कधीही टार्गेट नव्हते. अमेरिका व जपान हेच पहिल्यापासून टार्गेट होते. शेजारी देशांबद्दल 30 वर्षांपूर्वी चीन शांत होता. मात्र आता चीन आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने भारत त्यांच्या लक्ष्यावर आहे. हस्तांदोलन, गळाभेटीनं सगळं शक्य होत नाही हे मोदींना आता कळून चुकले असेल. चीनने आपले शेजारी पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका यांना आपलेसे करुन भारताला घेरले आहे, असे पवार म्हणाले.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापूर्वी चीनसोबत आपले सहकार्याचेच संबंध होते. चीन आज ना उद्या महासत्ता बनणार हे नेहरुंना माहित होते. चीनबरोबर संघर्ष दोघांच्याही हिताचा नाही, असे नेहरुंना वाटे. पण नेहरुंसोबत दुर्दैवाने चीनने वेगळी भूमिका घेऊन संघर्ष केला. नेहरु-इंदिरा-वाजपेयींचे परराष्ट्र धोरण आताही तेच आहे. मोदींनी परराष्ट्र धोरण बदलले म्हणतात, पण ते खरे नाही.
राहुल गांधी म्हणतात, चीनने जमीन बळकावली ते बरोबर आहे. आपण जगामार्फत चीनवर दबाव आणून प्रश्न सोडवावा. आपण चीनवर प्रतिहल्ले करण्याऐवजी राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवावा. प्रतिहल्ले केलेच तर त्यानंतरच्या हल्ल्यांनाही तयार राहायला पाहिजे, असा इशारा पवारांनी दिला.
अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली
करोनाच्या संकटकाळात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणकारांसोबत चर्चा करण्याची नितांत गरज आहे.
देशाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या व्यक्तीची 100% गरज आहे. मनमोहन सिंग, नरसिंहरावांनी देशाला आर्थिक दिशा दिली आहे. मोदींनी मनमोहन सिंगांशी बोलून पावले टाकायला हवी. संकट मोठं आहे. एका पक्षाच्या विचाराने काही होणार नाही. मोदींच्या सेटअपमध्ये संकटांचा अनुभव असलेले लोक नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
Mhanunach america, france, japan tiwan, UK sagle bhartala madat kartayt.