रोम – रोममधील जी20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑक्टोबर 2021 रोजी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांची इटलीमध्ये भेट घेतली. त्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. करोनाच्या जागतिक साथीच्या काळात जी 20 चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान द्राघी यांचे अभिनंदन केले. ग्लासगो येथे कॉप -26 च्या आयोजनात देखील इटली ब्रिटनबरोबर भागीदार आहे.
दोन्ही नेत्यांनी हवामान बदलामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करण्याची गरज यावर चर्चा केली. पंतप्रधानांनी भारताने केलेल्या परिवर्तनात्मक हवामान संबंधी उपाययोजनांचा तसेच विकसित जगाच्या हवामान संबंधी वित्तपुरवठा वचनबद्धतेबद्दल विकसनशील देशांच्या चिंतांचा उल्लेख केला.
दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तान आणि हिंद-प्रशांत क्षेत्रासह अलिकडच्या जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींबाबत मते मांडली. त्यांनी भारत-युरोपीय महासंघ दरम्यान बहुआयामी सहकार्य दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये भारत-इटली आभासी शिखर परिषदेनंतरच्या घडामोडींचा आढावा घेतला आणि त्या शिखर परिषदेत स्वीकारलेल्या 2020-2025 कृती आराखड्याच्या अंमलबजावणीतील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. राजकीय, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक या क्षेत्रातील धोरणात्मक उद्दिष्टे यात निश्चित करण्यात आली असून ती पुढील पाच वर्षांत साध्य करायची आहेत.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील विशेषत: वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन निर्मिती उद्योग आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीतील संबंध अधिक विस्तारण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
नवीकरणीय ऊर्जा आणि स्वच्छ उर्जेमध्ये द्विपक्षीय सहकार्याला नव्याने चालना देण्यासाठी, भारत आणि इटलीने ऊर्जा संक्रमणावर धोरणात्मक भागीदारीची घोषणा करणारे संयुक्त निवेदन जारी केले,तसेच मोठे ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प, स्मार्ट ग्रिड, ऊर्जा साठवण उपाय, गॅस वाहतूक, एकात्मिक कचरा व्यवस्थापन (कचऱ्यापासून संपत्ती), ग्रीन हायड्रोजनचा विकास आणि उपयोजन आणि जैव-इंधनाला प्रोत्साहन यांसारख्या क्षेत्रात भागीदारीच्या संधींचा शोध घेण्याबाबत सहमती दर्शवली.
या बैठकीदरम्यान भारत आणि इटलीने वस्त्रोद्योग सहकार्याबाबत निवेदनावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान द्राघी यांना लवकरच भारत दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण पंतप्रधानांनी दिले.