पाटणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार निवडणुकीतील प्रचाराची पहिली रॅली घेताना तेथे कलम 370 चा मुद्दा उपस्थित करीत हा प्रचाराचा मुद्दा बनवला. ते म्हणाले की, आम्ही सत्तेवर आलो तर कलम 370 पुन्हा लागू करू अशी विधाने काही पक्षातील नेत्यांनी केली आहेत.
हाच मुद्दा बिहारच्या निवडणुकीत उपस्थित करून येथे मते मागण्याचे धारिष्ट्य त्यांच्याकडे आहे काय असा सवाल मोदींनी उपस्थित केला. ते म्हणाले की, बिहारमधील अनेक युवक सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत त्यांचा हा अपमान नाही काय असा सवालही त्यांनी केला.
ते म्हणाले येथे मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच जे सगळे सर्व्हे आले आहेत त्यात एनडीएच विजयी होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत असे असताना काही लोक बिहारमध्ये नवीन समिकरण साकारले जात असल्याचे भाकित वर्तवून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण बिहारी मतदार अशा प्रचारांना भुलणार नाही असे मोदी यांनी नमूद केले.
ज्यांनी बिहार हे आजारी राज्य बनवले ते पुन्हा येथे सत्तेवर येण्याची स्वप्ने पहात आहेत. ज्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार शिगेवर होता, ज्यांच्या राजवटीत बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीची पूर्ण वासलात लागली त्यांना येथील जनता पुन्हा निवडून देणार नाही असा दावाही मोदींनी यावेळी केला.
करोनाच्या काळात देशातील जनतेला आपल्या सरकारने खूप मदत केल्याचा दावा करून मोदी म्हणाले की ज्यांचे रेशन लूटले जात होते त्यांना आम्ही त्यांच्या घरी रेशन नेऊन दिले. ज्यांचा पैसा भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात जात होता तो पैसा आम्ही जनतेच्या थेट खात्यावर जमा केला असा दावाही मोदींनी केला. आम्ही गरीब आणि शोषितांसाठीच काम करीत आहोत असा दावा करून मोदी म्हणाले की दलित आणि ओबीसींना आम्ही पुढील दहा वर्षांसाठी आरक्षण लागू केले.
उच्चवर्गातील गरीबांनाही आम्ही आरक्षण दिले असे ते म्हणाले. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी बिहारमध्ये पुन्हा नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.