काश्मीर मुद्द्यावरून भारतविरोधी आकांडतांडव
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीर मुद्द्यावरून भारतविरोधी आकांडतांडव केला. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही गरळ ओकली. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करून मोदींनी घातक चूक केल्याचा थयथयाट इम्रान यांनी केला.
पाकिस्तान नेहमीच काश्मीरवर वक्रदृष्टी ठेऊन आहे. त्यातून तो देश दरवर्षी 5 फेब्रुवारीला काश्मीर एकता दिवस पाळत असतो. काश्मिरी जनतेविषयी खोटे प्रेम दाखवण्यासाठी ती नौटंकी केली जाते. ते नाटक पुढे नेत इम्रान यांनी बुधवारी पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभेत भाषण केले. मोदींच्या कृत्यामुळे एक दिवस काश्मीर मुक्त होईल असा विश्वास मला वाटतो.
मोदींमुळे आम्हाला काश्मीर मुद्दा जगापुढे हिरीरीने मांडण्याची संधी मिळाली. निवडणुकीत पाकिस्तानला बळीचा बकरा बनवल्याने मोदींना विजय मिळाला. त्यामुळे त्यांनी काश्मीरबाबतचे पाऊल उचलले. आता चुकीपासूून मोदी माघार घेऊ शकत नाहीत. हिंदू राष्ट्रवादाचा राक्षस आता बाटलीतून बाहेर आला आहे. तो पुन्हा बाटलीत बंद करता येणार नाही, असे इम्रान म्हणाले.
काश्मीरवरून जगाचे लक्ष विचलित करण्याची संधी भारताला मिळणार नाही याची दक्षता पाकिस्तान घेईल. दहशतवादाची भीती दाखवून भारत काश्मीरमध्ये कारवाई करेल. भारताने काश्मीरमधील निर्बंध हटवावेत, अशी मागणीही इम्रान यांनी केली.