नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या श्रीमंतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मित्रांना आणखी श्रीमंत बनवण्यासाठी सामान्य माणसाची लूट करणे एवढेच काम मोदी करत असल्याचे त्यांनी म्हटले.
जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानी यांनी तिसरे स्थान मिळवले आहे. जगातील पहिल्या तीन श्रीमंतांमध्ये समावेश झालेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले आहेत, असा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तर, दुसऱ्या अहवालात भारतातील आत्महत्येच्या घटनांशी संबंधित आकडेवारी देण्यात आली आहे. त्या अहवालांचा आधार घेऊन राहुल यांनी एक ट्विट केले. एकीकडे भारतात दर तासाला रोजंदारीवर काम करणारे 5 नागरिक आत्महत्या करत आहेत.
तर, दुसरीकडे मोदींच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत दर तासाला 85 कोटी रूपयांची भर पडत आहे, असे राहुल यांनी म्हटले. कॉंग्रेस आणि विशेषत: राहुल यांच्याकडून सातत्याने ठराविक उद्योगपतींवर मेहेरनजर केली जात असल्याचा आरोप मोदी आणि त्यांच्या सरकारवर केला जात आहे. आता अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत आणखी वरचे स्थान गाठल्यावरून सरकारला लक्ष्य करण्याची आणखी संधी कॉंग्रेसला मिळाली आहे. (Modi looting common man to make friends richer – Rahul Gandhi)